म्हणे वाल्या सुधारला, कसाबलाही संधी द्या !

वाल्या कोळयामध्ये मुळात ऋषी होण्याची क्षमता असल्याने त्याला नारदमुनींनी उपदेश केला व तो वाल्मिकीऋषी झाला. त्याची तुलना राष्ट्राचा शत्रू असलेल्या कसाबशी करून कसाबच्या अधिवक्‍त्यांनी समस्त हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवल्या आहेत. अशा हिंदुद्वेष्ट्या अधिवक्‍त्यांचा तीव्र निषेध !
मुंबई, १९ मे (वार्ता.) - दरोडेखोर वाल्यात सुधारणा होऊन जर तो एक संत व प्राचीन हिंदु धर्मग्रंथ `रामायणा'चा रचनाकार वाल्मिकी होऊ शकतो, तर आरोपीला सुधारण्याची एक संधी का दिली जाऊ नये, असा प्रश्‍न मुंबईवर हल्ला करणारा अतिरेकी अजमल अमीर कसाब याचे अधिवक्‍ता काझमी यांनी केला. (काझमी यांनी भर न्यायालयात वाल्या कोळी व कसाब यांना एकाच पंक्‍तीत बसवून हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवल्याबद्दल बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना व राजकीय पक्ष काय करणार आहेत ? - संपादक) जीवन देण्याचा आपल्याला अधिकार नसल्याने एखाद्या व्यक्‍तीचा जीव घेण्याचाही आपल्याला अधिकार नाही. प्रत्येक आरोपी सुधारण्याची शक्यता असते, असे सांगत कसाबला फाशीची शिक्षा देण्यास काझमी यांनी न्यायालयात विरोध दर्शवला. (कसाबलाही १८३ जणांचा जीव घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता. तरीही त्याने भारताविरुद्ध युद्ध पुकारत हे बळी घेतले. त्यामुळे त्याचा बळी घेण्याचा अधिकार भारताला निश्चितपणे पोहोचतो. एवढेच नव्हे, तर राष्ट्र भयमुक्‍त व्हावे, यासाठी कसाबची पाठराखण करणार्‍यांनाही कठोर शिक्षा करण्याचा नैतिक अधिकार भारताला आहे, हे कसाबच्या सर्व पाठीराख्यांनी लक्षात घ्यावे ! - संपादक) या संदर्भात शासकीय अधिवक्‍ता उज्ज्वल निकम म्हणाले, ``फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे त्यातील गांभीर्य व धाक कमी होत आहे. ज्यांचे पुनर्वसन शक्य नाही, अशांविषयी न्यायालय असे कठोर निर्णय देते. मी लढवलेल्या खटल्यांमध्ये तब्बल ३३ जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे; परंतु या सर्वांना फाशी देणे अद्याप शक्य झालेले नाही. (असे घडणारा व अतीगंभीर गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना ठार करण्याऐवजी पोसणारा जगातील एकमेव देश भारत ! अशा देशातून गुन्हेगारी, भयोत्पादन यांचे उच्चाटन कधीतरी होईल का ? - संपादक) कसाबला केवळ फाशीची शिक्षा ठोठावून भागणार नाही, तर त्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित व्हायला हवी. त्याशिवाय अन्य पर्याय नाही !''
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links