सचिन एक महान फलंदाज आहे यात वादच नाही. ज्यांना क्रिकेट पाहून आनंद मिळतो त्यांना तो देव वाटतो. हेही ठीकच. कारण समाजात रिअॅलिटी शोजनासुद्धा हात वर करून हलवणाऱ्या प्रौढांची कमी पडत नाही तिथे क्रिकेटचं काय घेऊन बसलात?
सचिन तेंडुलकर हा देशाचा हीरो आहे. त्याच्या कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे झाली. सर्व माध्यमांनी त्या दिवशी सचिनविषयी असा थाट केला होता की जणू सचिन हा मानवजातीचा एकमेव तारणहार आहे. अर्थात बहुसंख्य जनतेचे मत तसे नसेलही. परंतु हल्ली सवंगतेच्या नादी लागलेली माध्यमं बहुसंख्य जनतेच्या मताला फाटय़ावर मारतात! मी स्वत: क्रिकेट फार क्वचित बघतो. कोणत्याही सिंथेटिक (अनैसर्गिक) गोष्टीत मला आनंद मिळत नाही. जगात आनंद मिळवाव्या अशा गोष्टी निसर्गातच भरपूर आहेत. एखादा शेतकरी शेती करताना पाहताना मला सचिनच्या बॅटिंगचा साफ विसर पडतो किंवा साधं जंगलातून चालत जाताना गच्च भरलेलं मधाचं पोळं पाहताना मला ‘क्रिकेट’ ही गोष्ट ‘पीएसपी’, ‘गेम बॉय’ वगैरेसारखी सिंथेटिक आणि खोटी वाटते. तशी ती आहेच. ‘ऑरगॅनिक’ (नैसर्गिक) गोष्टींचा आनंद उधळायला माणसात अभिजातता लागते. सचिन किंवा कोणताही क्रिकेटर ही एक व्हच्र्युअल रिअॅलिटी आहे. एक प्रकारचं टेक्नॉलॉजिकल मॉर्फिन किंवा अफू!
हिम्मतराव बावीस्कर नावाच्या महाडच्या डॉक्टरने विंचवाच्या दंशावर लस शोधून काढली. देशातल्या अनेकांचे प्राण त्याने सहजपणे वाचू लागले. त्याच्या कारकीर्दीला किती वर्षे झाली ते आपणाला ठाऊक आहे? त्यासारखेच प्रकाश- मंदा आमटे, अभय- राणी बंग यांच्या कारकीर्दीला किती वर्षे झाली ती या माध्यमांनी सेलिब्रेट केलीत कधी? किंवा इस्त्रोचे वा अनेक जीव, भौतिक, गणितातले भारतीय शास्त्रज्ञ वा समाजसेवक असतील, ज्यांनी मानवजात जगवली, घडवली, सुसंस्कृत केली. कितीजणांची कारकीर्द अशी सेलिब्रेट झाली?

क्रिकेट आणि सचिन हे माझ्या दृष्टीने मानवी जीवनाच्या लक्षावधी वर्षांच्या प्रवासात अशाश्वत असे फारशी दखल न घेण्याजोगे टप्पे आहेत. जे टप्पे येतील आणि जातील. सचिन तेंडुलकर वीस वर्षे खेळला आणि त्याने विक्रमांवर विक्रम केले ते त्याने हेमलकसात जाऊन केले? की प्रयोगशाळांच्या बंद भिंतीआड आपल्या प्रयोगाचं आणि आपलं भवितव्य अधांतरी असताना माणूस जगावा, रोगमुक्त आणि सुखी व्हावा यासाठी केले?
युगातल्या ग्लॅडिएटर्सना स्वातंत्र्य, पैसा व प्रसिद्धी मिळते एवढाच काय तो फरक. पण हे व्हावं म्हणून अनेक विचारवंतांनी, क्रांतिकारकांनी, लक्षावधी पुस्तकं लिहिलीत. ते फासावर गेलेत. जगभरची प्रस्थापित सरंजामी राज्यशकटं त्यांनी उलथून टाकलीत. तेव्हा हे ग्लॅडिएटर्स गुलामगिरीतून स्वातंत्र्यात आलेत. त्या महान विचारवंत, क्रांतिकारक व लेखकांची नुसती नावं लिहायला हजारो पुस्तकं लिहायला लागतील.
सचिन तेंडुलकरविषयी मला कोणतीच भवना नाही. ना प्रेम, ना आदर, ना तिरस्कार, ना द्वेष, ना खंत, ना खेद. तो आपली नव्या संस्कृतीतली तलवारबाजी करून रग्गड पैसे कमवतो आहे. पण त्याला वापरून, आपल्या दैनंदिन जीवनात ज्यांनी दु:ख, दैन्य आणि हताशता निर्माण केली आहे ते त्याचा आपल्याला विसर पाडू इच्छितात याचा मला त्वेष आहे. कोणत्याही काळातल्या कोणत्याही विचारवंताला, लेखकाला तो असतोच. शेतकरी आत्महत्या करतो त्यावर सचिनने उपाय शोधावा असं मानणं हे गैर व त्याच्यावर अन्याय करणारं आहे. कारण देशाच्या कृषीमंत्र्याकडूनच आपण जिथे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा करतो तिथे बिचारा सचिन काय करणार?
मला आत्यंतिक लाज या गोष्टीची वाटते की, मराठीतल्या अनेक लेखक, कलावंत, गायक, राजकीय नेते वगैरेंनी सचिनसोबतच्या आपल्या तऱ्हेतऱ्हेच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. बोललेल्या आहेत. त्या वाचताना एखादा समाज लयाला जाताना त्या समाजातले जाणकार कसे अफूबाज होतात याचं मला दर्शन झालं. या साऱ्यात केवढी वैचारिक दिवाळखोरी आहे याची मराठी वाचकांना कल्पना आहे का? सचिनची पत्नी अंजली या सचिन बॅटिंग करताना गणपतीकडे बघतात, पाणी पितात वा ना पितात, खातात, नाही खात वगैरे.. किंवा सचिन चड्डीत होता तेव्हा ‘साहित्य सहवास’च्या काचा कसा फोडत होता.. किंवा मी लंडनमध्ये सचिनसोबत भोजन कसे घेतले (काय पदार्थ घेतले लिहिल्यास वाचून मराठी वाचकांची पोटे तरी भरली असती!) वगैरे वाचण्यात व ऐकण्यात अख्खा मनुष्यदिवस वाया घालवणे म्हणजे माणसाला गुहेतून आधुनिक संस्कृतीपर्यंत ज्यांनी आणलं अशा असंख्य, अज्ञात अनाम माणसांचा अपमान आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव वगैरे वगैरे पुढे भारतीय राजकारण्यांनी हे उद्योग करावे यासाठी फासावर गेले होते का? ‘इस्त्रो’ (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन)चे संशोधक पन्नास र्वष जगापासून अज्ञात राहून या विश्वाच्या मूलतत्त्वाचा अभ्यास करतात. त्यांना त्यांच्या कारकीर्दीची वीस र्वष पूर्ण झाली हे त्यांच्या धर्मपत्नीनेही सांगितलं नसेल!
या वैचारिक दिवाळखोर समाजात सचिनचा देव झाला. मग त्याने ‘मुंबई सर्वाचीच’ असं विधान केलं. ते स्वाभाविकच आहे. कारण आता उद्या सचिनला तुम्ही देव बनवून तुमच्या अॅपेंडिक्सबद्दल विचाराल व ऑपरेशन करायला सांगाल तर तो तुमचं स्वादुपिंड वेडंवाकडं फाडून ठेवणारच. तो ‘खेळ्या’ आहे, विचारवंत नव्हे. श्रीमंत असल्याने त्याला तुम्ही मान देता ते ठीकच. कारण पैशाचा मनुष्य हा लगेच दास होतो. पण सचिनला डॉ. आंबेडकरांना व जदुनाथ सरकारांना जे प्रश्न विचारायचे ते विचारलेत की हीच उत्तरं तो देणार. नशीब या विषयावर त्याचे चिमखडे बोल त्याने बोबडय़ा आवाजात काढले नाहीत. नाही तर त्याचंही कौतुक!
सचिन स्वत:ला आंतरराष्ट्रीय अशा इमेजमध्ये ठेवू इच्छितो. त्यामुळे तो कधीच महाराष्ट्र धर्माचा होणार नाही. कारण डॉ. आंबेडकर आणि महर्षी कर्वे हे दोन ‘भारतरत्न’ अगोदरच मुंबई मराठी माणसाची आहे, असं म्हणून गेलेत. सचिन तर अजून ‘पद्मविभूषणच’ आहे!
ग्लॅडिएटर म्हणूनही गांगुली आणि सचिन यात गांगुली श्रेष्ठ आहे. कारण तो जाणीवपूर्वक बंगाली माध्यमं व माध्यम प्रतिनिधींना अत्यंत जवळ ठेवतो. स्थानिक बंगाली चॅनल्स व भाषेतच जास्त करून बोलतो आणि शेवटी अकरा काय किंवा अकरा कोटी काय त्यांचा नेता बनणं हे मोठय़ा ग्लॅडिएरचं काम आहे. ते गांगुलीने यशस्वीपणे केलंय. सचिन कर्णधार म्हणून साफ आपटला. त्याचं स्मरण आपल्याला आहे का? की आपण मात्र तो मराठी म्हणून त्याचं हे सर्वात मोठं वैगुण्य लपवायचं? सचिनचं एक मला आवडतं. त्याला उकडीचे मोदक आवडतात. मला पण. पुढच्या वर्षी माझ्याही कारकीर्दीला वीस र्वष पूर्ण होतील.
3 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links